21/06/25

|| श्री स्वामी समर्थ || *जीवनाची अवघड वाट सोपी करणारे ‘गुरुमाऊली’* *’श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्रीगुरुप्रणाली’*

|| श्री स्वामी समर्थ ||

*जीवनाची अवघड वाट सोपी करणारे ‘गुरुमाऊली’*

*’श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्रीगुरुप्रणाली’*

श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित हा आध्यात्मिक जगतात सर्वश्रेष्ठ असा भगवान श्री दत्तात्रेय यांचा सेवा मार्ग आहे.भगवान श्री गुरु दत्तात्रेय व आदिनाथ गुरू भगवान श्री शंकर यांनी जबरदस्त अशा नाथ संप्रदायाची निर्मिती केली. भगवान श्री शंकर हे या पंथाचे निर्माते आहेत. त्यांच्याच आदेशाने श्री गुरुदत्तात्रेयांनी श्रीनवनाथांचे गुरुपद भूषविले व त्यांना सर्व प्रकारचे यंत्र,मंत्र,तंत्र व अस्त्र विद्येत पारंगत केले. यांच्याच सान्निध्यात राहून परम सद्‌गुरु श्री ब्र.भू.श्री पिठले महाराजांनी श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाची स्थापना केली.श्री पिठले महाराजांच्या महानिर्वाणानंतर सद्‌गुरु प.पू. मोरेदादांनी ही परंपरा दिंडोरी जि. नाशिक येथून पुढे चालविली व वाढविली,आज या मार्गातील सर्व कार्याची धुरा प.पू.गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

भारतात अनेक धर्म,अध्यात्म मार्ग, पंथ,संप्रदाय आहेत. त्यामध्ये प्रवचनाद्वारा मोक्षाचीच प्रेरणा दिली जाते पण सध्याच्या काळात ही प्रवचने सर्वसामान्य माणसाला आचरणास कठीण वाटतात.जोपर्यंत मानवाच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक समस्या सुटत नाहीत तोपर्यंत मानव निरपेक्ष मोक्षाची इच्छा व प्रयत्नही करु शकत नाही.त्यातच अनेक अध्यात्मिक धार्मिक मार्गात बुवाबाजी, गुरुबाजी, फसवेगिरी चालु असल्यामुळे माणसाची मुळ अध्यात्म मार्गावरील श्रद्धाच ढासळू लागली आहे. अशा परिस्थितीत ‘श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग’ हा सुलभ, विनामुल्य मार्गदर्शनाचा असल्यामुळे समाजाला संजीवनी स्वरुप ठरत आहे. हा मार्ग प्रथम मानव जीवाची सर्व प्रकारच्या कौटुंबिक समस्यातून अध्यात्मिक सेवेद्वारे मुक्तता करतो आणि तो जीव पुढे कायम मानसिक शांतता लाभावी या हेतूने अध्यात्मिक सेवा स्वयंप्रेरणेने सुरुच ठेवतो. त्यामुळे सर्व कुटुंब या सेवा मार्गात वाटचाल करुन सुसंस्कारीत, आत्मविश्वास, कर्तबगार, निर्भय असे घडविले जाते.
श्री दत्त महाराजांचा पूर्ण अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी कोऱ्या पोथी पांडित्याची निष्फळता दर्शवून विष्णुबुवा ब्रम्हाचाऱ्याचा दंभ नष्ट केला. *करता आणि करविता तुचि एक स्वामिनाथा!माझियाठायी वार्ता मीपणाची नसेची*!! हा भाव दूढ झाल्याशिवाय समर्पण भाव बुद्धित रुजल्याशिवाय स्वामिंची कृपा मिळत नाही.म्हणूनच प.पू. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अहंकाराचे निर्मुलन हा पाठ सेवेकऱ्यांना दिला.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या गुरुंचे पुजन, स्मरण अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने केलेच पाहिजे. गुरुंचे पुजन न करणे हा कृतघ्नपणा ठरेल, गुरुंच्या आज्ञांचे पालन, गुरुंच्या आदेशाची क्रिया पुर्तता व गुरुंच्या उपदेशाचे जीवनात नित्य आचरण म्हणजे गुरुभक्ती होय.हीच गुरुभक्ती माणसाला भय, अज्ञान, निराशा, उदासिनता, चिंता, रोग यापासुन मुक्त होण्यासाठी आत्मबल देते. निष्ठेने व श्रध्देने केलेल्या गुरुभक्तीमुळे माणसाचे जीवन शांतीमय व आनंदी बनते आणि शांतीमय व आनंदी जीवन हेच जीवनाचे अंतिम साध्य आहे. गुरुभक्तीमुळेच माणसाला मानसिक व्याधीपासून मुक्तता मिळते. जीवनात अनेक सकटे, अडचणी निर्माण होतात. अशा कठीण प्रसंगी गुरु आपल्या भक्ताचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे रक्षण करतात. माणसाला दुःख मुक्त होवून आनंद प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा असेल तर अंत:करणापासुन गुरुभक्ती करणे आवश्यक आहे. *आदर्श गुरु कोणाला समजावे?*

आदर्श गुरुच्या ठायी शिष्याविषयी प्रेमळ असा मातृपितृभाव असतो. त्यांचे आचरण शुध्द असते. तो सकल शास्त्रांचा अभ्यासक असतो. त्यांची नित्य उपासना अखंडपणे चालु असते. तो नित्य परोपकार वृत्तीने शिष्यांचे दुःख निवारण्यात मग्न असतो. तो शांत स्वभावाचा, मधुर बोलणारा व देवता समान असतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने शिष्याच्या जीवनात शुभ घडते तो कुलीन, दानी, शुध्दवेषधारक, मंत्र, तंत्र जाणणारा निरोगी, अहंकारी, निरहंकारी, विकाररहीत, ज्ञानी व दैवीशक्ती धारक असतो. सद्‌गुरुंची ही सर्व लक्षणे प.पू. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांना लागू पडतात. म्हणूनच प.पू.गुरुमाऊलींना त्यांचे सेवेकरी शिष्य श्री स्वामी समर्थांच्या रुपात पाहतात.श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाग्यवान आहेत.त्यांचे गुरुपद प्रत्यक्ष ईश्वराने घेतलेले आहे. *अनन्यश्चितयंतोमां ये जनः पर्युपासते!तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्!!*
जे सत शिष्य निष्ठेने व श्रध्देने गुरुला शरण जातात व गुरुंची उपासना करतात. त्यांना गुरु महाराज वचन देतात की,त्यांच्या प्रपंचाची पूर्ण काळजी मी स्वतः घेईन. श्री स्वामी समर्थ महाराज सुमारे दीडशे वर्षापुर्वी समाधीस्त झाले असले तरी आजही निष्ठावान सेवेकऱ्यांना ते कोणत्या ना कोणत्या रुपाने भेट देतात व त्यांची कामे करतात. देह ठेवल्यानंतरही काही दिवसानंतर ते आपल्या निष्ठावान सेवेकऱ्यांना भेट देवून म्हणाले,*मैं गया नहीं, मैं जिंदा हूं*!!

*जीवनात गुरुंची गरजः*

जन्मतः मनुष्य लाकडाच्या ओंडक्यासारखा किंवा चिखलाच्या गोळ्यासारखा असतो. गुरुंची शिकवण व मार्गदर्शनामुळेच त्याच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. बालक कितीही बुध्दीमान असला तरी गुरुशिवाय तो शिकू शकत नाही. आपल्या स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी आरशाची गरज असते. आरसा आपल्या चेहऱ्यावरील दोष, दुर्गुण कळतात व गुरुंच्या उपदेशामुळेच हे दोष व दुर्गुण नाहीसे होतात, गुरुच परब्रम्ह आहे, गुरुच परमज्ञान आहे, गुरु हेच सर्वश्रेष्ठ धन आहे. गुरुशिवाय मिळवलेले ज्ञान अर्धवट असते. गुरुशिवाय मिळवलेले ज्ञान कुचकामी व निरुपयोगी असते. *निमहकीम खतरे मे जान* या उक्तीप्रमाणे अर्धवट ज्ञान दुःखाला व मृत्यूला कारणीभूत होवू शकते.
*श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून २०% अध्यात्म आणि ८०% समाजसेवा*
प.पू. गुरुमाऊली यांचे आशिर्वादाने, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अष्टसिध्द महाशक्तीपीठ त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी सभर्थ सेवा मार्ग दिंडोरी जि. नाशिक या सेवा मार्गाच्या माध्यमातुन विश्वाच्या कल्याणासाठी आणि भारत मातेच्या संपन्नतेसाठी तसेच देशामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, भ्रष्टाचार निर्मुलन व्हावे, नैसर्गिक किंवा मानव निर्मिती आपत्तीपासून जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी अध्यात्मातून सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. हा सेवा मार्ग अनुभूतीचा असून प्रत्येक व्यक्तीला या सेवेत सहभागी होवून आपले अमुल्य जीवन कृतार्थ करण्याची संधी आहे. मानवी जीवनामध्ये गुरुंचे अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरुपद घेण्याविषयी विनंती करुन आपला योगक्षेम चालविण्यासाठी आशिर्वाद मागण्याची संधीअसल्यामुळे रविवार दि. २१ जुलै रोजी जवळच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. बीड शहरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, भाग्यनगर,सहयोगनगर,आदर्शनगर, लोणारपुरा,गजानन नगर, कालिकानगर,बार्शी नाका अशोकनगर येथे तसेच सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि त्यात्या तालुक्यात सर्वांनी हा गुरुपुजनचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवेकरी यांनी केले आहे.या दिवशी सर्वांनी सकाळी ८ ते सायं.६ पर्यंत या सेवेस उपस्थित रहावे.

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …