बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना!
गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम
आत्माराम वाव्हळ|बीड
मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातील पन्नास गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी उपक्रमाच्या माध्यमातून पाच लाख भाकरी-चपात्या सह ठेचा, लोणचं आणि चटणीची शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी मुंबईच्या दिशेने रवाना केली. या शिदोरीच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबईतील आझाद मैदानात 29 ऑगस्ट पासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पावसामुळे जेवणाची व्यवस्था होऊ शकली नाही. तसेच सरकारने देखील सर्व दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने आंदोलनकर्त्यांना उपाशी पोटी झोपावे लागले होते. तसेच आझाद मैदानावर पावसाने चिखल पसरला आहे, ज्यामुळे आंदोलकांना अस्वच्छता आणि हाल सहन करावे लागत आहेत. काही आंदोलनाकडे स्वयंपाकाचे साहित्य आहे, पण पावसामुळे त्यांना स्वयंपाक करता येत नाही. आणि परिणामी उपासमारीचे संकट मराठा आंदोलनाकावर आले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात आंदोलकांना शिदोरी पाठवण्यात येत आहे. काल बीड जिल्ह्यातील भडंगगाव आणि परिसरातील पन्नास गावामधून मोठ्या संख्येने नागरिकांनी माधुकरी गोळा करून मुंबईला पाठवण्यास सुरुवात केली आहे. या शिदोरीच्या माध्यमातून आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी पन्नास गावातून पाच पाच लाख भाकरी-चपात्या, ठेचा लोणचं आणि चटणीच्या रूपाने शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना केली. यावेळी तांदूळ व २०० बॉक्स पाणी बॉटल आणि स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस, भट्टा व इतर साहित्य पाठविण्यात आले. दरम्यान यावेळी महिलांनी सरकारमधील आमच्या तीन लाडक्या भावांनी तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून लाडक्या बहिणीच्या लेकरांचे भविष्य उज्ज्वल करावे अशी मागणी केली.
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com