21/06/25

प्रत्येक किशोरवयीन मुलीस वयात येताना बाबतची शास्त्रीय माहिती असणे अत्यावश्यक- प्राचार्य डॉ सविता शेटे

प्रत्येक किशोरवयीन मुलीस वयात येताना बाबतची शास्त्रीय माहिती असणे अत्यावश्यक-
प्राचार्य डॉ सविता शेटे

बीड दि.२८(प्रतिनिधी)- “प्रत्येक किशोरवयीन मुलीस वयात येताना बाबतची शास्त्रीय माहिती असणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाह प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी यशवंत विद्यालयात ‘किशोरीं समोर वयात येताना’ या विषयावर व्याख्यान देताना केले.
र.धो. कर्वे यांनी लैंगिक शिक्षणावर केलेले काम, त्यांनी १५ जुलै १९२७ रोजी सुरू केलेले समाजस्वास्थ्य मासिक या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर जुलै महिन्यात लैंगिकता प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले आहेत. याच अनुषंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बीडच्या वतीने आयोजित “वयात येताना” या विषयावर प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी यशवंत विद्यालय बीड येथे किशोरवयीन मुलींसमोर व्याख्यान दिले. या प्रसंगी त्यांनी या बाबतची संपूर्ण शास्त्रीय माहिती दिली. वयात येणे म्हणजे नेमकी काय प्रक्रिया होते ? शरीरात स्त्रवणारे स्त्राव, त्यामुळे मुलींच्या शरीरात होणारे शारीरिक बदल ,भावनिक बदल, त्यामागील शास्त्रीय कारणे, मासिक पाळी, त्याची प्रक्रिया, त्यामागील विज्ञान, मासिक पाळी विषयीचे अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा, गर्भधारणा यावर सविस्तर माहिती दिली. तसेच या काळात किशोरीनी घ्यायची काळजी ,समतोल आणि पौष्टिक आहार, विश्रांती, व्यायाम, स्वच्छ्ता याची सखोल माहिती देवून मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करावे यावर मांडणी केली.
मासिक पाळी कोणत्याही दृष्टीने अपवित्र नसून ती पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अपत्य प्राप्तीसाठी असणारी पूर्वअट आहे.
हे प्रत्येक मुलीस आणि महिलेस माहित असणे खूप आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या किंवा अशास्त्रीय माहिती मधून अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा वाढीला लागतात. वाईट घटना घडतात. याचा परिणाम मुलींच्या एकूण वाढ आणि विकासाच्या प्रक्रियेवर होतो. मुलींचे हे वय फुलण्याचे असते. त्यामुळे किशोरींसह शिक्षक आणि पालकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. या व्याख्यानाच्या वेळी मुलींनी अनेक प्रश्न विचारले ,यापूर्वी आम्हाला याची माहिती नव्हती, अजून माहिती द्यावी अशी मुलींची मागणी होती. यावरून या विषयाचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे,असे डॉ सविता शेटे यांनी सांगितले. याप्रसंगी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश वाघ उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांनी या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …