एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन!
एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान
बीड दि.२७(प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून मांजरसुंबा बस स्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे मांजरसुबा येथील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात उपस्थित राहता आले नाही. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन मांजरसुंबा बस स्थानकात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी मांजरसुंबा बस स्थानकात ठिय्या आंदोलन करताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली. त्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी सुरक्षितरीत्या पोहोचले. यापुढे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात येण्यासाठी एसटी बस उपलब्ध न झाल्यास शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव तथा शिक्षक सेना बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
बीड एसटी महामंडळाच्या गलथान कारभारामुळे व हलगर्जीपणामुळे मांजरसुंबा बस स्थानकामध्ये मागील तीन दिवसापासून एसटी बस येत नसल्यामुळे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. मांजरसुंबा येथील डॉक्टर पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये 140 मुली व 90 मुले नियमित पासधारक आहेत. ते धनगरवाडी, कपिलधारवाडी, कोळवाडी, गवारी व उदंड वडगाव या ठिकाणाहून शाळेला एसटी बसने ये जा करत आहेत. परंतु मागील तीन दिवसापासून एसटी बस न आल्यामुळे त्यांना शाळेत येण्या-जाण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आज मंगळवार दिनांक 27 रोजी विद्यार्थी विद्यार्थिनीनी शिक्षक व कर्मचा-यांनी एसटी बससाठी मांजरसुंबा बस स्थानकात ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बस उपलब्ध करून दिली. त्या नंतर विद्यार्थी सुरक्षितरित्या आपापल्या गावी घरी परत गेले.
एसटी महामंडळ राजकीय पक्षांच्या सभा व मेळाव्यासाठी बीड येथून एसटी बस बाहेरगावी पाठवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची प्रचंड हेळसांड होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. यानंतर एसटी बस वेळेवर व नियमित न आल्यास मांजरसुंबा चौकात विद्यार्थी,पालक, शिक्षक कर्मचारी व मुख्याध्यापकांच्या मार्फत रास्ता रोको करण्यात येईल आणि एसटी महामंडळाच्या सर्व आगाराच्या बस अडवण्यात येतील असा इशारा बीड जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव तथा शिक्षक सेना बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील यांनी आगार प्रमुख एसटी आगार बीड व विभाग नियंत्रक रा. प . म . बीड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री, शिक्षण मंत्री दीपक केसरकर महाराष्ट्र यांना पाठवण्यात आल्या.
_________________________