संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा
आंदोलनाचा 52 वा दिवस
आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन
बीड दि.22(प्रतिनिधी)- गेल्या 52 दिवसांपासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 52 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा जी आर काढण्यात येईल, 18 तारखेला आपली कॅबिनेट आहे त्यावेळी निर्णय घेतला जाईल असे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते, परंतु ती झालीच नाही. काल एकोणीस तारखेला कॅबिनेट होईल अशी आशा असतानाच एकोणीस तारखेची कॅबिनेट ही रद्द झाल्याने सर्व शिक्षकांची घोर निराशा झाली असून आता सोमवार दि. 23 रोजी कॅबिनेट होणार आहे. अनेक दिवस कॅबिनेट बाबत चालढकल आणि या आंदोलनाकडे सरकारने फारसे लक्ष न दिल्याने हे शिक्षक संतप्त झाले आहेत. सरकारला आता या शिक्षकांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अल्टिमेटम दिला असून येत्या सोमवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश जर निघाला नाही तर बुधवार दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या सर्व संतप्त शिक्षकांनी सरकारला दिला आहे. सदर आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी यांना देण्यात आले आहे.
- विनाअनुदानित शाळांमधील या शिक्षकांना गेली अनेक वर्ष तुटपुंजा पगार मिळतोय. 12 जुलैला सरकारने अंशत: अनुदानित शाळांसाठी वाढीव टप्पा अनुदान जाहीर केले होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलक शिक्षकांची संख्या जवळपास 67 हजार इतकी आहे. हक्काचे अनुदान मिळत नसल्याने हे सगळे शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी बसले आहेत. या 52 दिवसांपैकी 11 दिवस विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रस्ता रोको, तसेच अनेक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींना, आमदार खासदारांना भेटून निवेदनही दिलेली आहेत. त्यानुसार लोकप्रतिनिधींनी शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री, मंत्रालयातील जबाबदार अधिकारी यांना फोन करून पाठपुरावा देखील केलेला आहे. मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनीही वाढीव टप्प्याचा जीआर कॅबिनेट बैठकीत काढतो असे सर्वांना सांगितले आहे. परंतु कॅबिनेट बैठकच लांबत असल्याने हे शिक्षक संतप्त झाले आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, दादा लाड केदारी मगदूम, सुभाष खामकर, शशिकांत खडके, अनिल ल्हायकर, वैद्यनाथ चाटे,जितेंद्र डोंगरे, आत्माराम वाव्हळ, तुकाराम शिंदे, सुरेश कदम, रामदास जामकर, भागवत यादव, पी एस देशमुख, प्रेमकुमार बिंदगे, अरविंद पाटील, राजू भोरे ,भानुदास गाडे, कन्हैय्या पगार, विक्रांत नेरकर, अविनाश वाघ, संग्राम कांबळे, मुक्ता मोटे स्मिता उपाध्ये, नेहा भुसारी, गौतमी पाटील, भाग्यश्री राणे, विद्या पूजेरी यांच्यासह राज्यातील शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – येत्या सोमवारी कॅबिनेट बैठक असल्याचे समजते. गेली दोन महिने शिक्षकांनी मोठा संघर्ष केलेला आहे. याचे शासनाने भान राखून कोणतीही गुंतागुंत किंवा धोका न करता शिक्षकांच्या मागण्याप्रमाणे मंगळवार दिनांक 24 पर्यंत जीआर काढावा. अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील.
खंडेराव जगदाळे,
उपाध्यक्ष, विनाअनुदानित कृती समिती