21/06/25

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम

रायगड दि.२६(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद
मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा
व सक्षम विद्यार्थी बनविणारा प्रमुख भाग असल्याचे मत
कुडली शाळेच्या मुख्याध्यापिका
सुशीला म्हात्रे मॅडम यांनी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
या बाबत अधिक माहिती अशी की शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य माहित व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रत्यक्ष व्यवहार कसा करावा याचे प्रात्यक्षिक देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील कुडली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक २५ जानेवारी, २०२५ रोजी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला म्हात्रे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. स्वागता नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम म्हणाल्या की, आमची शाळा ही विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. शालेय अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी आज शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा आयोजित करून प्रत्यक्षात व्यवहार कसा करावा, बाजारात आपला माल कसा विकावा याचा प्रत्यक्षात अनुभव आज या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा अनुभव त्यांच्या भावी जीवनात शिदोरी म्हणून कायम सोबत राहणार आहे. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोब ताळमेळ हे सर्व कौशल्य शिकण्यास मिळते. त्यामुळे अशा मेळाव्याचे प्रत्येक शाळेत आयोजन केले पाहिजे असे ही मुख्याध्यापिका म्हणाल्या.
या बाल आनंद मेळाव्यात
या मेळाव्यात पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपले पारंपारिक खाद्यपदार्थ आणले होते. शिवाय दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूं विक्रीसाठी आणल्या होत्या. या मध्ये प्रामुख्याने सर्व मुला मुलींनी विविध खाण्याचे स्टॉल लावलेले होते. स्टॉलमध्ये मिसळ पाव, अंडा भुर्जी, वडापाव, भेळ, मिसळपाव, पाणीपुरी, पॅटीस, लिंबू सरबत, कलिंगड, मंचुरियन इत्यादी स्टॉल लावलेले होते. यामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर हसू व आनंद दिसून आला. या आनंदमेळातून मुले व्यवहारिक ज्ञान, आनंद, गणितीय क्रिया, सहकार्य, एकमेकांना मदत, अशा निराळ्या प्रकारच्या बाबीची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
आपण आणलेला माल लवकरात लवकर विकला जावा यासाठी मेळाव्यात स्टॉल लावलेले विद्यार्थी बाजारातील व्यापाऱ्या प्रमाणे मोठ्याने आवाज देऊन विद्यार्थी ग्राहकांना आपल्या स्टॉलकडे आकर्षित करत होते. या ठिकाणी होणारा आवाजाचा गलका पाहून आज शाळेत बाजार भरला की काय असे भासत होते. या आनंदमेळामध्ये सर्व पालक ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व शिक्षक उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षक मोहन राठोड, सारिका पोटे, अविनाश जाधवर इत्यादींनी प्रयत्न केले. अशाप्रकारे आनंद मेळावा शाळेत साजरा करण्यात आला.

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …