शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न
मुक्त संवादाने तणावावर मात करा-
मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड
कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे
बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत ताण-तणाव निर्माण होताना दिसतात. परंतु, सकारात्मक विचार, छंद जोपासणे, यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे केलेली मेहनत व प्रत्येक गोष्टीचे नियोजन, आपल्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षक, पालकांशी मुक्त संवाद साधणे या गोष्टी केल्यास नक्कीच ताण-तणाव दूर सारून आयुष्यात यशस्वी होता येते, असा आशावाद बीड शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर मनीषा बिक्कड यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण-तणाव व विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्याना प्रसंगी बोलताना व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय चव्हाण सर हे होते. तर व्यासपीठावर योगशिक्षक डॉ. संजय तांदळे, आत्माराम वाव्हळ सर, श्रीमती फाटे मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर योगशिक्षक तथा समाजसेवक डॉ. संजय तांदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉक्टर संजय तांदळे म्हणाले की,
यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरूच असते. परंतु, विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता आपले ध्येय समोर ठेवून यशाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. अपयशाची करणे शोधण्या ऐवजी यशाचे मार्ग शोधावेत असे डॉ. तांदळे म्हणाले. त्यानंतर बीड शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. मनीषा बिक्कड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या वेळी त्या बोलताना डॉ मनिषा बिक्कड मॅडम म्हणाल्या की, आज विद्यार्थी व पालकांचा संवाद हरवत चालला आहे. विद्यार्थी एकल कोंडे बनत चालले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी पालकांना प्रतिसाद देत नाहीत, तर काही ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसाठी वेळच नाही, असे प्रकर्षाने जाणवते. तर दुसरीकडे आजची तरुणाई व विद्यार्थी हे मोबाइल फोन, सोशल मीडिया यातच व्यस्त दिसतात. आपल्या मनातील प्रश्न व समस्या शेअर न केल्याने त्यांच्यात तणाव वाढत असून, ते नैराश्याच्या गर्तेत सापडताना दिसतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्यांचा पालक व शिक्षकांशी मुक्त संवाद वाढणे, चांगले मित्र-मैत्रिणी निवडणे, अपयशातून यशाकडे यशस्वी वाटचाल केलेल्या व्यक्तींचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे, असा सल्लाही
डॉ. मनीषा बिक्कड यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आत्माराम वाव्हळ सर यांनी तर आभार श्रीमती साळुंके मॅडम यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
____________________________