धरणे आणि कठडे ही फोटोंची ठिकाणं नाहीत; मुलांकडे लक्ष द्या!
ॲड. अजित देशमुख यांचे आवाहन
बीड दि.३१ (प्रतिनिधी) पावसाळा सुरू होताच जिल्यातील धरणे, तलाव आणि नद्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. मात्र, या निसर्गरम्य ठिकाणी जिवाशी खेळणे कितपत योग्य आहे, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. विशेषतः धरणे आणि त्यांच्या कठड्यावर जाणे, सेल्फी घेणे किंवा मुलांना तिथे मोकळे सोडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जनतेने स्वतः आणि मुलांना यापासून वाचवावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आज काल सोशल मिडियाच्या क्रेझमुळे लोक कुठेही फोटो किंवा व्हिडिओसाठी थांबतात. पण धरणांचे कठडे, जलप्रपात, पूल हे काही फोटोजाठी योग्य ठिकाणे नाहीत. हे ठिकाणं जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर असतात,” असे सांगून देशमुख यांनी क्षणभराची असावधता गंभीर दुर्घटना घडवू शकते त्यामुळे आपण आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्या असे त्यांनी पालकांना आवाहन केले आहे.
— प्रशासनाची जबाबदारी आणि जनतेचा सहभाग —
देशमुख यांनी प्रशासनालाही आवाहन केले की, अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावावेत, अडथळे तयार करावेत आणि गस्त वाढवावी. मात्र फक्त प्रशासनावर जबाबदारी टाकून उपयोग नाही. प्रत्येक नागरिकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.
जीवन हेच सर्वात मोठं सेल्फी आहे, त्याला सुरक्षित ठेवा, हा संदेश देत ॲड. अजित देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केलं की, पर्यटनाचा आनंद घ्या, पण जबाबदारीने आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करा. प्रशासनाने देखील कठोर कारवाई करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
—-