माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन!
स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर
बीड दि.२८(प्रतिनिधी)- स्व. काकू – नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही. आता आपण स्वयंपूर्ण आहोत. माझ्या जागी आपणच आहात असे समजून तुम्ही चमत्कार करा.
आपल्या सर्वांच्या साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार असा विश्वास व्यक्त करत मतदारांना आणि कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
काल रविवार दि. 27 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बीड मध्ये आगमन होणार असल्याची माहिती मिळतात तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसिंगी टोल नाक्यापासून ते बीड शहरापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून स्वागत केले. हजारो गाड्यांचा ताफा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या स्वागतासाठी गेला तेंव्हा ते भारावून गेले होते. रस्त्यात ठीक-ठिकाणी लोकांनी तसेच त्यांचे स्वागत केले. अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तोफांची सलामी देत आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले. बीड शहरात आगमन होताच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी स्व.काकू-नाना यांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकू-नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे. आपला एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मला प्रेरणा देणार आहे.आपण आज मला मोठा प्रतिसाद दिला. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही हे मी आज सर्वांसमोर जाहीर करतो. मी अनेक चढउतार अनेक वळणे बघितली आहेत. करता करविता परमेश्वर आहे, नियती सर्वांचा हिशोब करत असते लोकशाहीत असेच आहे लोक संधी देऊन बघतात आपण आपला वसा आणि वारसा नुसार चालावं लागतं पण आज कुणाचा आदर्श घ्यावा असा कोणी आहे का असा प्रश्न आहे. समरसतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाहीत कुठलातरी निर्णय घ्यावा लागतो आता आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर पुढचा डाव जिंकता येईल जात-पात बाजूला ठेवून आपण सर्वजण पुढे जाऊया आपला आरसा स्पष्ट आहे. वास्तव आणि वस्तुस्थिती सर्वांसमोर आहे. आपण आपला अधिकार वापरण्याची वेळ आली आहे. येत्या 20 तारखेला आपली ताकद दाखवावी लागेल. मी सेवेचे व्रत घेतले आहे. माझ्याकडून सेवा करून घेणे हे आपले काम आहे. तुम्ही पोटतिडकीने बोलता तसे काम करा, आपण वाट बघितली थांबलो देखील पण आपलं मूळ आपल्याला विसरता येणार नाही. आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही माझ्या जागी आपणच आहात असे समजून तुम्ही चमत्कार करा. उद्या दिनांक 29 तारखेला अर्ज भरणार आहोत ही निवडणूक भाग्यरेषा बनवणारी आहे आपल्याला जे साध्य करायचे यासाठी समर्थ साथ द्या लोकशक्ती हीच माझी शिदोरी आहे आता दिवाळी आहे फटाके तर वाजत असतात परंतु आपले फटाके हे विजयाचे फटाके वाजले पाहिजेत असा दृढ निश्चय करा असे आवाहन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित जनसमुदायास भावनिक आवाहन केले.
यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे सर्व प्रमुख समर्थक, कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.