स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
बीड दि.८(प्रतिनिधी)- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझ हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी माझ्या समवेत बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. आज मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. त्यांचं अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना भरघोस मतांनी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे राष्ट्रीय नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल मंगळवार दि.७ मे रोजी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभा पार पडली. या सभेच्या सुरुवातीलाच वारकरी सांप्रदायाचा फेटा, शौर्याच प्रतिक दांडपट्टा व कष्टकरी समाजाच प्रतिक घोंगडी व काठी देवून पंकजाताई यांच्याकडून पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला. या प्रचारसभेत मोदींनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना मोदी म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षाही जास्त अनुभव होता. गेल्या 10 वर्षात गोपीनाथ मुंडे, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर अनेक सहकारी मला सोडून गेले. तुम्ही कल्पना करु शकता का,जेव्हा आपले गेले तेव्हा माझ्या अडचणी किती वाढल्या असतील? त्यामुळे या सर्व सहकार्यांची मला खूप आठवण येते, मी इथे आलो आहे ते तुमच्याशी बोलण्यासाठीच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे माझे व्यक्तिगत मोठे नुकसान झाले. येणार्या 13 मे रोजी गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या वेळी पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी राम मंदिरही कॅन्सल करेल, इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर हे लोक मोदींची किसान सन्मान निधी योजना कॅन्सल करतील. गरीबांना मोफत रेशन देण्याची योजना कॅन्सल करतील, 55 कोटी गरीबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची योजना देखील काँग्रेस कॅन्सल करेल. त्यामुळे मी आज तुमच्याकडे काही मागायला आलोय. मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. माझी संपत्ती तुम्ही आहात. तुम्हीच माझे कुटुंब आहात. माझा देश माझे कुटुंब आहे असे शेवटी मोदी म्हणाले.
चौकट
यावर्षी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीवर काही ठोस असे उपाययोजना मोदी करतील अशी अशा समस्त बीडकरांना होती. मात्र मोदी यांनी शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले बाजार भाव, दुष्काळ यावर कोणतेही भाष्य केले नाही. अगदी सोयस्कर पद्धतीने या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांना मोदी यांनी बगल दिली. बीड जिल्ह्याचा गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न या कृष्णा बाबत मोदी यांनी बोलणे आवश्यक असताना त्यांनी बीड रेल्वेचा प्रश्न ओझरता हाताळल्यामुळे या सभेतून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे बीडची जनता भाजपाला किती साथ देते हे येत्या 13 मे ला समजेल.
__________________________